मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि ‘भाजप’ची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भाजप’ची बैठक २१ मे २०१९ रोजी मुंबईत झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. या वेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ‘भाजपचे खासदार, आमदार, लोकसभा उमेदवार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची बैठक लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी झाली. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम केले असून, जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे युतीला मोठे यश मिळेल असे चित्र स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रामुख्याने चर्चा झाली.’
‘भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी दुष्काळी भागाला आणि चारा छावणीला भेट देतील; तसेच गावातील पाणी टंचाईचा आढावा घेतील. सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत त्याच्या अंमलबजावणीचा आढावा लोकप्रतिनिधी घेतील व अडचणी दूर करतील. दुष्काळाचा सामना करणारे गावकरी-शेतकरी यांच्यासाठी आमदार निधीतून पैसे खर्च करता यावे अशी आमदारांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार विशेष बाब म्हणून एक शासन निर्णय काढण्यात येईल. या निधीतून आमदार दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टाकी, चारा छावणी व टँकर इत्यादीसाठी मदत करू शकतील,’ अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
फडणवीस व दानवे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप पक्ष संघटनेने प्रभावी कार्य करण्याची सूचना त्यांनी केली. या प्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार डॉ. रामदास आंबटकर व आमदार डॉ. संजय कुटे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळी स्थिती व त्यावर भाजप सरकारने केलेली उपाययोजना याची माहिती दिली. आशिष शेलार, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व सुजितसिंह ठाकूर यांनी विविध मतदारसंघांचा आढावा घेतला. विजयराव पुराणिक यांनी पक्षाने निवडणुकीसाठी केलेल्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.